You are currently viewing त्रिपिंडी श्राद्ध

त्रिपिंडी श्राद्ध- पितरांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या मुक्ती साठी त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांच्याबद्दल दाखविलेली श्रद्धा म्हणजेच श्राद्ध. पितृपक्षातील पंधरवड्यात ह्याचे फार महत्व मानले गेले आहे.

तमोगुणी, रजोगुणी आणि सत्यगुणी असे तीन प्रेतयोनीत पितरांचे विभाजन होते. पृथ्वीवर वास्तव्यास असणारे तमोगुणी, अंतरिक्ष मध्ये वास्तव्यास असणारे रजोगुणी आणि वायू मंडळात वास्तव्यास असणारे सत्वगुणी. ह्या तिन्ही प्रकारातल्या पितरांच्या मुक्ती साठी त्यांना गती मिळण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.

काही पिढ्यांत प्रेतयोनीतील पितर हे त्या पिढ्यांतील काही व्यक्तींना पीडा देणारे असतात त्यांच्या शांती साठी त्यांच्या तृप्ती साठी त्यांना सदगती मिळावी ह्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.

आपल्याला माहित नसलेल्या मागील सर्व पितरांचे श्राद्ध आणि काही पितरांना मुले बाळे नसताना त्यांचे कोणतेही श्राद्ध झालेले नसते अशा आपल्या घराण्यातील सर्व पितरांसाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.

एरवी केली जाणारी श्राद्ध आपण आपले पिता , आजोबा , पणजोबा ह्यांच्यापुरते मर्यादित असते पण त्रिपिंडी श्राद्ध आपल्या घराण्यातील सर्व पितरांना उद्धेशून हे श्राद्ध कर्म करण्याची रीती आहे.

जेव्हा सतत ३ वर्षे काही कारणांमुळे श्राद्ध केले गेले नसेल तर अशा वेळी त्या घराण्यातील पितर हे शापित होतात आणि त्यांचा कोप वाढून ते त्या घराण्याला ग्रसित करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा चुका झाल्यास त्रिपिंडी श्राद्ध करावे. आणि जरी प्रत्येक वर्षी श्राद्ध कर्म होत असतील तरी एका घराण्यात प्रत्येक १२ वर्षांनी हे श्राद्ध करून घ्यावे.
त्यामुळे पितरांमुळे होणारे त्रास ज्याने कुणाला संतान नसेल, विवाहात बाधा असेल, कार्यक्षेत्री प्रगती नसेल, घराण्यात आजार सतत सुरु असतील तर अशा सर्व प्रश्नांसाठी एकच विधी म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध.

कोण करू शकेल हे श्राद्ध

त्रिपींडी श्राद्ध करण्याचा अधिकार अविवाहीत आणि विवाहित मुले सुद्धा करू शकतात.
आई वडील जिवंत असणाऱ्या वक्ती सुद्धा हे श्राद्ध करू शकतात. आयुष्यभर दरिद्रता, अनेक प्रकारची दुःखे किंवा घराण्यात कधीच श्राद्ध कर्म करत नसल्यामुळे भूत – प्रेत, गंधर्व, राक्षस, शाकिणी, डाकिणी, रेवती, जंबूक यांपासून त्रास होतो. त्रिपींडी श्राद्ध केल्यामुळे अनेक लोक व्याधींपासून मुक्त झाले आहेत.

त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी योग्य मुहूर्त

तशी सर्वात महत्वाची वेळ हि पितृपक्षातील कोणत्याही दिवशी असते हे श्राद्ध करण्यासाठी. पण अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, अमावास्या, पौर्णिमा या तिथी ला सुद्धा हे श्राद्ध करण्याची रीती आहे.

गुरु, शुक्र अस्त असताना, गणेशोत्सव नवरात्रोत्सव सुरु असताना हे श्राद्ध करू नये.

काही ग्रंथपुराणानुसार हे श्राद्ध खालील खास महिन्यात आणि तिथीत करू शकतो
श्रावण, कार्तिक, मार्गशिर्ष, पौष, माघ, फाल्गुन आणि वैशाख ५, ८, ११, १३, १४, ३० शुक्ल किंवा कृष्ण पक्ष तिथीत आणि रविवारी सुद्धा करू शकतो.

त्रिपिंडी विधी

ह्या श्राद्धात प्रथम ब्रह्मा विष्णू महेश ह्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. तीन प्रकारचे पिंडदान ब्रह्मा – नैतिक , विष्णू – शाही आणि महेश – क्रोधी ह्यात अशी हि नावे आहेत.

ब्रह्मा – धर्म पिंड , विष्णू – व्रीहिपिण्ड , महेश – तिलपिण्ड

अशा तिन्ही प्रकारच्या पितरांपासून चे कष्ट कमी व्हावेत त्यांना सदगती मिळावी ह्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध केले जाते.

पुढे असाही उल्लेख खाली दिल्याप्रमाणे मिळतो.

  • धर्मपिंडात पितृवंशातील व मातृवंशातील ज्या मृतांची उत्तरक्रिया झाली नसेल किंवा ज्यांना संतती नसेल , किंवा ज्यांचे लग्न वगैरे झाले नसेल अशाना हे पिंड दान केले जाते त्यात जवाच्या पिठाचे पिंड असते. ह्याला यवपिंड सुद्धा म्हणतात.
  • व्रीहिपिंडात जे पितर फार शाही असतात आणि अंतरिक्ष मधेच राहून त्यांना गती न मिळाल्यामुळे घराण्याला त्रस्त करतात त्यांचे पिंडदान तांदळाच्या पिठाचे असते. ह्या पिंडावर साखर तूप मध एकत्र करून घालतात.
  • तिलपिंडात जे पितर फार उग्र , रागिष्ट असतात त्यांना पिंड दिला जातॊ. पृथ्वीवर क्षुद्रयोनीत राहून इतरांना पीडा देणार्‍या पितरांना तीलपिंडाने सदगती प्राप्त होते.

प्रदेश प्रांत ह्याप्रमाणे काही विधीत थोडाफार फरक असू शकतो जास्त फरक नसतो ह्यात.

विधी झाला कि श्री विष्णू साठी तर्पण केला जातॊ आणि दक्षिणा म्हणून वस्त्र, पात्र, पंखा, पादत्राण इत्यादी वस्तू दानात दिल्या जातात. आणि ब्राह्मण भोजन दिले जाते. काही वेळा हे जमत नसल्यामुळे तेवढा खर्च देण्याची सुद्धा रीती आहे.

कुठे करावा त्रिपिंडी श्राद्ध

कोणत्याही तीर्थ क्षेत्री हा विधी करू शकतो. गोदावरी नाशिक , काशी आणि भारतातील प्रमुख नद्यांच्या किनारी आणि तीर्थक्षेत्री हे कार्य केले जाते. ह्या विधी साठी त्र्यंबकेश्वर फार प्रसिद्ध आहे.

माझ्या मताप्रमाणे

आपल्या घराण्यात काही त्रास पिढी दर पिढी सुरु असेल. पितृदोष वगैरे पत्रिकेत दाखवत असेल तर सरळ विचार न करता हे श्राद्ध करून घ्यावे. पण काही जणांच्या नशिबी जर भोग संपत नसतील तर कोणती तरी दैवी शक्ती हे श्राद्ध करण्यासाठी अडचणी निर्माण करेल किंवा योगच येत नाही किंवा इच्छा होत नाही. तर अशांना घराण्यात गीता वाचन सुरु करावे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि विष्णू सहस्त्रनाम पाठ करावेत. ह्याने पितरांबद्दल चे कार्यात इच्छा पूर्ण होते.

आणि सध्या पितृपक्ष सुरु आहे ह्यासाठी खालील प्रयोग सुरु करावा.
एका गुल्लर मधे आजपासून संकल्प करून थोडे पैसे जमा करावेत. प्रेत्येक पगाराला किंवा तुमच्या प्रॉफिट मधील एक छोटा हिस्सा त्यात टाकत रहावा. जेव्हा कार्य सिद्धी जुळून येईल हे कार्य करण्यासाठी तेव्हा ह्या पैशाचा उपयोग जरूर करावा.

नवीन पिढी ने हा प्रयोग नक्की करून पाहावा. ज्यांची आत्ताच करिअर ला सुरुवात झाली आहे.
प्रयोग सुरु असताना सुद्धा काही चांगले परिणाम दिसतील ह्यात शंका नाही.

थोडे तिखट

अंध श्रद्धा आहे, असे काही नसते, असे फाजील आत्मविश्वास बाळगून स्वतःला फार सुशिक्षित समजून काना डोळा करू नये ही विनंती. कोणत्याही सध्या सुरु असलेल्या पोस्ट वर विश्वास ठेऊ नये. आपण अशा धर्मात जन्म घेतला आहे जिथे बाळाची नाल आईशी पोटात जोडल्या पासून आणि त्याने जन्म घेतल्या नंतर आणि मृत्यू नंतर ही तो पिंड सुरक्षित आणि समाधानी रहावा अशा कित्येक विधी ज्या धर्मात आहेत. आणि त्याचे पुरावे आपल्या धर्म ग्रंथात मिळतात सुद्धा.

ज्यांनी हे त्रिपिंडी श्राद्ध केले आहे आणि परिस्थितीत काहीच बदल झाला नसेल त्यांनी गीता वाचन आणि विष्णू सहस्त्र नाम पाठ करत राहून पुन्हा हा विधी करावा.

तुम्हाला काही पोस्ट अशा मिळत असतील कि पितरांची सेवा जिवंत पणी करत नाहीत तर त्याचा आता काय उपयोग. माझे ह्यावरील मत असे कि हे त्यांचे आणि तुमचे दोघांचे ही भोग असतात जन्म घेताना वेळी पत्रिकेत असे योग जरूर इंडिकेट होतात कि तुम्ही त्यांना जिवंत पणी किती सुखी ठेवणार.

त्यांची सेवा तुमच्या कडून होईल का नाही हे भोग कापता येत नाहीत. तर त्या व्यक्ती गेल्या कि त्या पत्रिकेतील योग सुद्धा संपतो आणि तुम्ही त्यांचे ऋण काही अशा कर्मातून फेडू शकता. ज्याने त्रास कमी होतो.

धन्यवाद…..!

Leave a Reply